TOD Marathi

राज्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विविध दसरा मिळावे चर्चेचा विषय ठरत आहेत. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरातील विजयादशमी मेळावा आणि भगवान बाबांचं जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथील पंकजा मुंडे यांचा मेळावाही चर्चेचा विषय आहे.

नुकतीच पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि अगदी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेचे आभार व्यक्त केले. आपल्याकडे उपस्थितांना बसायला द्यायला खुर्च्याही नाहीत तरी आमच्यावर असलेल्या प्रेमापोटी सर्व लोक आले आहेत. खुर्च्या असत्या तर चारपट लोक आली असती, असं म्हणत एक प्रकारे मुंबईत जय्यत तयारीने मेळावे होत आहेत, त्याच्यावर नाव न घेता पंकजा मुंडे यांनी टीका केली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपलं भाषणाच्या सुरुवातीलाच हा चिखल फेकणाऱ्यांचा मेळावा नाही असं म्हणत हा निष्ठावंतांचा मेळावा आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्यावर पातळी सोडून टीका झाली मात्र मी कधी कुणावर टीका केले नाही अशा पद्धतीने टीका करणे हे आमच्या रक्तात नाही आमच्या संस्कार नाही असेही त्या म्हणाल्या.

‘हकिकत को तलाश करना पडता है, अफवाएं तो घर बैठे मिलती है’ असं म्हणत अप्रत्यक्षपणे आपल्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या किंवा चुकीची माहिती पसरवली गेली, असा जणू संदेश पंकजा मुंडे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात पंकजा मुंडे यांनी केलेल्या विविध वक्तव्यांच्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत्या. त्याचा संदर्भ पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितला नसला तरी हिंदीतून बोललेल्या या शायरीचा संदेश तोच होता का? असा देखील प्रश्न निर्माण होतो.